अमित शहांनी शेतकऱ्यांवर नांगर फिरवला; शिरीष कोतवाल यांचा आरोप
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज कांदा निर्यातीचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या घरावर केंद्र सरकारने नांगर फिरवला आहे. आता त्याचा काय उपयोग? असा सवाल काँग्रेस नेते माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तीन लाख टन कांदा निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेस नेते कोतवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सरकारला कांदा निर्यातबंदी करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या फार तर आमच्या सात जागा कमी होतील. मात्र कांदा खाणाऱ्या ग्राहकांच्या 60 ते 70 जागा टिकून राहतील, असा विचार सरकाने केला आहे. हे अत्यंत खेदजनक असून भारतीय जनता पक्ष आपल्या राजकारणासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय किंमत देतो हे यावरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले.भारतीय जनता पक्षाने (BJP) कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर आजपर्यंत शेतकऱ्यांचे वीस ते पंचवीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आज निर्यातीला परवानगी दिल्यावर शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून येणार आहे का? भाजप त्याची भरपाई करणार आहे का? आज शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग होणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. भाजपला यातले काहीही समजत नाही. ते केवळ राजकारण करतात. म्हणूनच त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशी वागणूक दिली आहे, असा आरोप कोतवाल यांनी यावेळी केला.
