त्या' नेत्याच्या काळजीपोटी आंबेडकर आणि इम्तियाज जलिल यांचे एकमत
- Anant Suralkar
- Feb 18, 2024
- 1 min read
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नसल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यानंतर यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ही चिंतेची बाब असून पोलिसांनी यावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. आताच्या राजकारणात काहीही होऊ शकतं असेही जलील म्हणाले. खासदार इम्तियाज जलील आज (ता. 18) अकोला दौऱ्यावर असतांना पत्रकार परिषदेत बोलत होते.मनोज जरांगे यांच्या विषयी प्रकाश आंबेडकर हे बोलले असतील तर नक्कीच याबाबत त्यांच्या कडे काही इनपुट असतील. त्यामुळे पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांची काळजी घ्यावी, असेही जलील म्हणाले. दरम्यान इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं. तर प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवार देणार यावर बोलताना जलील म्हणाले की, याबाबतचा निर्णय असुदुद्दीन ओवेसी घेतील आणि तेच माहिती देतील. मात्र प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत किती जागा मिळतील हे अजुन ठरलं नाही. यावर महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी लवकर निर्णय घ्यावा असेही जलील म्हणाले.
